समाजाने नीतीमूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवावी..
तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...
नांदेड : महात्मा गांधी यांचे विचार जगाला आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. महात्मा गांधींनी विचार आणि तत्व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आजचा समाज त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून बघत असेल तर समाजाने नीतिमूल्यावर अढळ श्रद्धा ठेवताना जे चांगले आहे ते चांगले आणि जे वाईट आहे त्या विरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवलाच पाहिजे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त तुषार गांधी याचे 'गांधीजींना व त्यांच्या विचारांना आपणास कसे जोडता येईल' या विषयावर शंकरराव चव्हाण सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नांदेड विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, बापू दासरी, देविदास फुलारी, डॉ. गीता लाठकर, मनोरमा चव्हाण, कल्पना डोंगळीकर यावेळी उपस्थित होते.
‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार’
प्रशांत खेडेकर यांना जाहीर !
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्रामार्फत देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार कळमनुरी जि. हिंगोली येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी श्री. प्रशांत कैलास खेडेकर यांना जाहीर झाला असून येत्या २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नांदेड येथे महात्मा गांधी यांचे पणतू जेष्ठ गांधी अभ्यासक मा. तुषार गांधी यांच्या हस्ते व माजी शिक्षणमंत्री तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्राचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पंधरा हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.